आचार्य विनोबा भावे यांना भेटायला एक महिला आली. ती म्हणाली,'' मी दु:खी आहे. माझा पती दारुडा आहे. रोज दारू पिऊन मला अपशब्द बोलत असतो आणि कधी-कधी मारहाणही करतो. माझे जीवन त्याने नरकासमान बनवले आहे.'' विनोबांनी तिला विचारले,''तो जेव्हा दारू पितो तेव्हा तू काय करत असतेस?'' ती म्हणाली,'तेव्हा मला त्याचा खूप राग येतो. पहिल्यांदा मी त्याला फार वाईट बोलायची, परंतु त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही हे पाहून मी आता उपवास करणे सुरु केल आहे.'' विनोबांनी प्रश्न केला,''उपवासात खाणे-पिणे सर्व सोडून देतेस का?'' महिला म्हणाली,''नाही, फळे खात असते.'' तेव्हा विनोबांनी म्हटले,'' मग तर तुझा पती आणखीनच नाराज होत असेल, कारण की तुझ्या फळे खाण्यामुळे घरखर्चात वाढ होत असेल.'' हे ऐकताच महिला रडू लागली तेव्हा विनोबा म्हणाले,'' रागाने किंवा जेवण सोडून दिल्याने कुणालाही चुकीच्या मार्गावरून हटवले जाऊ श्कत नाही. प्रेम तेच असते, जे आपल्यात निर्माण होते. मनात दुर्भावना असेल आणि प्रेमाचा देखावा केला तर त्याचा प्रभाव उलट होतो.'' महिला म्हणाली,''मी काय करु? त्याला दारुच्या नशेत पाहून माझा माझ्यावर ताबा राहत नाही.'' विनोबांनी समजावले,'' हेच तर चुकीचे आहे, तू आपल्या पतीला वाईट मार्गापासून तेव्हाच रोखू शकशील, जेव्हा तू वाईट गोष्टींना समजून घेशील. त्याचा पहिल्यांदा प्रयत्न कर.'' महिलेच्या लक्षात आपली चूक आली की, क्रोधाने क्रोधाला जिंकले जाऊ शकत नाही. त्यावर प्रेमानेच विजय मिळविता येऊ शकतो हाच मार्ग मिळाल्याचा आनंद तिच्या चेह-यावर दिसू लागला.
तात्पर्य :- वाईट व्यक्तीची घृणा करत बसण्यापेक्षा वाईट वृत्ती कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि हे कार्य दृढ इच्छाशक्तीनेच शक्य आहे.
No comments:
Post a Comment