Vbl

Wednesday 13 May 2015

मानवता

जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही


तात्‍पर्य:-ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.

सोन्‍याची कुदळ

एका माणसाला दोन मुले होती जेव्‍हा तो म्‍हातारा झाला. तेव्‍हा त्‍याने आपल्‍या दोन्‍ही मुलांना बोलावले आणि म्‍हटले,' आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्‍यापूर्वी मी तुम्‍हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्‍यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्‍ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्‍याकडे काहीच राहणार नाही. त्‍यामुळे धन-संपत्ती घ्‍यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्‍यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्‍यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्‍यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्‍यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्‍याला खोटे का सांगितले?मग त्‍याच्‍या आत्‍म्याने म्‍हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्‍य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्‍याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्‍त पीक त्‍याच्‍या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्‍तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला.


तात्‍पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्‍याच्‍या घरी समृद्धी, सुख अवश्‍य येते.

योग्य उपाय

आचार्य विनोबा भावे यांना भेटायला एक महिला आली. ती म्‍हणाली,'' मी दु:खी आहे. माझा पती दारुडा आहे. रोज दारू पिऊन मला अपशब्‍द बोलत असतो आणि कधी-कधी मारहाणही करतो. माझे जीवन त्‍याने नरकासमान बनवले आहे.'' विनोबांनी तिला विचारले,''तो जेव्‍हा दारू पितो तेव्‍हा तू काय करत असतेस?'' ती म्‍हणाली,'तेव्‍हा मला त्‍याचा खूप राग येतो. पहिल्‍यांदा मी त्‍याला फार वाईट बोलायची, परंतु त्‍याच्‍यावर कसलाही परिणाम होत नाही हे पाहून मी आता उपवास करणे सुरु केल आहे.'' विनोबांनी प्रश्‍न केला,''उपवासात खाणे-पिणे सर्व सोडून देतेस का?'' महिला म्‍हणाली,''नाही, फळे खात असते.'' तेव्‍हा विनोबांनी म्‍हटले,'' मग तर तुझा पती आणखीनच नाराज होत असेल, कारण की तुझ्या फळे खाण्‍यामुळे घरखर्चात वाढ होत असेल.'' हे ऐकताच महिला रडू लागली तेव्‍हा विनोबा म्‍हणाले,'' रागाने किंवा जेवण सोडून दिल्‍याने कुणालाही चुकीच्‍या मार्गावरून हटवले जाऊ श्‍कत नाही. प्रेम तेच असते, जे आपल्‍यात निर्माण होते. मनात दुर्भावना असेल आणि प्रेमाचा देखावा केला तर त्‍याचा प्रभाव उलट होतो.'' महिला म्‍हणाली,''मी काय करु? त्‍याला दारुच्‍या नशेत पाहून माझा माझ्यावर ताबा राहत नाही.'' विनोबांनी समजावले,'' हेच तर चुकीचे आहे, तू आपल्‍या पतीला वाईट मार्गापासून तेव्‍हाच रोखू शकशील, जेव्‍हा तू वाईट गोष्‍टींना समजून घेशील. त्‍याचा पहिल्‍यांदा प्रयत्‍न कर.'' महिलेच्‍या लक्षात आपली चूक आली की, क्रोधाने क्रोधाला जिंकले जाऊ शकत नाही. त्‍यावर प्रेमानेच विजय मिळविता येऊ शकतो हाच मार्ग मिळाल्‍याचा आनंद तिच्‍या चेह-यावर दिसू लागला.



तात्‍पर्य :- वाईट व्यक्तीची घृणा करत बसण्‍यापेक्षा वाईट वृत्ती कमी करण्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत आणि हे कार्य दृढ इच्‍छा‍शक्तीनेच शक्‍य आहे.

सखोल अभ्यास

खूप वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्‍य होते. माणसांनी खच्‍चून भरलेली एक रेल्‍वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्‍यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्‍यम उंचीचा हा मनुष्‍य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्‍याच्‍या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्‍यातील बहुतांश इंग्रज त्‍याची चेष्‍टामस्‍करी करत होते. त्‍याला खेडूत, अडाणी समजून त्‍याच्‍या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्‍यांच्‍या त्‍या चेष्‍टामस्‍करीकडे, टिंगल करण्‍याकडे त्‍या भारतीयाचे लक्ष नव्‍हते. तो त्‍याच्‍या नादात मग्‍न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्‍याने रेल्‍वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्‍काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्‍याला काहीबाही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्‍याने विचारले,’’ कोणी साखळी ओढून ही रेल्‍वे थांबविली’’ त्‍या सावऴया रंगाच्‍या व्‍यक्तिने उत्तर दिले,’’मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्‍वे’’ गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्‍यक्ति उत्‍तरली,’’माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्‍वे पट्ट्या खराब झाल्‍या आहेत.’’ गार्डने विचारले,’’ हे तुला कसे कळले’’ ती व्‍यक्ति म्‍हणाली,’’ माझ्या अनुभवानुसार रेल्‍वेच्‍या गतीमध्‍ये काही फरक पडला आहे आणि त्‍यामुळे रेल्‍वेचा जो विशिष्‍ट आवाज येतो तो न येता आवाज न येता वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज फक्त रेल्‍वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता.’’  गार्डने याची खातरजमा करून बघण्‍यासाठी त्‍या व्‍यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एका ठिकाणी खरोखरीच रूळाच्‍या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्‍टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असतानाच रेल्‍वेत त्‍या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. केवळ त्‍या माणसाच्‍या ज्ञानामुळे आज त्‍यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्‍या माणसाची प्रशंसा व स्‍तुती करू लागले. गार्डने त्‍यांचे आभार मानले व विचारले,’’ सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय’’ त्‍या माणसाने शांतपणे उत्तर दिले,’’ माझे नाव डॉ.एम. विश्र्वेश्‍वरैय्या असून मी व्‍यवसायाने इंजिनियर आहे.’’ त्‍यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्‍तब्‍ध झाले. कारण त्‍याकाळात विश्र्वेश्‍वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्‍हणून ओळखत होता. टिंगल करणा-या लोकांनी त्‍यांची क्षमा मागितली.

महत्‍व आईचे

एकदा एका व्‍यक्तीने स्‍वामी विवेकानंदांना प्रश्‍न विचारला,'' स्‍वामीजी, संसारामध्‍ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्‍याला का दिले जात नाही?मातेइतकाच पितासुद्धा महत्‍वाचा असूनसुद्धा पित्‍याला फारसे का महत्‍व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्‍वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्‍या व्‍यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्‍यांनी उचलला व त्‍या व्‍यक्तिच्‍या हाती देत ते म्‍हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्‍यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्‍वामी विवेकानंदांकडे आला,'' स्‍वामीजी माझी कंबर, पोट दोन्‍हीही खूप दुखत आहे. एक प्रश्‍न काय विचारला मी, तुम्‍ही असे काय विचित्र उत्तर दिले त्‍याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्‍वामी मंद स्मित करत म्‍हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्‍या मातेची महती ही तिन्‍ही लोकांत सर्वश्रेष्‍ठच आहे. ''



तात्‍पर्य :- आईसारखे दैवत सा-या जगतामध्‍ये नाही.

आचरण

फार वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्‍यासाठी राजवाड्याच्‍या छतावर गेली होती. तिने आपला मौल्‍यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्‍यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो कंठा(गळ्यातील हार) म्‍हणजे काहीतरी खाण्‍याची गोष्‍ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्‍याने कंठा खाण्‍यासाठी प्रयत्‍न केले. मौल्‍यवान अशा कंठ्यामध्‍ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्‍याने ते खाण्‍याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्‍याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्‍यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्‍या लक्षात एक गोष्‍ट आली की आपला मौल्‍यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्‍हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्‍ही त्‍याचा शोध घेण्‍याचे आदेश द्या.'' राजा म्‍हणाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्‍हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्‍याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्‍या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्‍या हाराचा शोध घ्‍या. जो कोणी तो हार आणून देईल त्‍याला आपण अर्धे राज्‍य बक्षीस म्‍हणून देऊ अशी घोषणाही त्‍याने त्‍यावेळी केली. अर्धे राज्‍य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्‍याच्‍या नाल्‍यामध्‍ये त्‍याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्‍या पाण्‍यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्‍य बक्षीसाच्‍या आशेने एका सैनिकाने त्‍या पाण्‍यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्‍याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्‍या मनातही लोभ निर्माण झाला. त्‍यानेही अर्धे राज्‍य मिळविण्‍यासाठी त्‍या नाल्‍यात उडी मारली. पण हार पुन्‍हा गायब झाला. त्‍या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्‍या आशेने त्‍या घाण पाण्‍यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्‍याच हातात येत नव्‍हता. सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्‍य प्रधानजी यांनाही अर्ध्‍या राज्‍याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्‍हा कोणी उडी मारे तेव्‍हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्‍य त्‍या पाण्‍याच्‍या वास सहन न झाल्‍याने पटकन पाण्‍यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्‍हा दिसू लागे. मंत्री, सरदार, मुख्‍य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्‍यात उड्या मारून हार शोधण्‍यासाठी प्रयत्‍न केले हे राजाच्‍या कानावर गेले व त्‍याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्‍य गमवावे लागेल. त्‍यासाठी राजाही तेथे आला व त्‍याने आपली राजवस्‍त्रे उतरवली आणि त्‍यानेही त्‍या नाल्‍यात उडी मारली. त्‍याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्‍यांनी विचारले हे काय चालले आहे.? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात?. राजा असणारा माणूस असल्‍या घाणेरड्या पाण्‍यात का उडी मारतो आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्‍यात पडला आहे म्‍हणून सर्वजण पाण्‍यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्‍याना विचारले काय झाले? संत त्‍यावर म्‍हणाले,'' अरे वेड्यांनो तुम्‍ही ज्‍या हाराकडे पाहून पाण्‍यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्‍यात दिसते आहे ते त्‍याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्‍ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्‍यात शोधत आहात.'' लोकांच्‍या लक्षात खरा प्रकार आल्‍यावर लोक शरमिंदा झाले.


लक्षात ठेवा - मानवी जीवनाची पण आज त्‍या लोकांप्रमाणेच अवस्‍था झाली आहे. जे आपल्‍याला पाहिजे आहे त्‍याच्‍या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती, मनस्‍वास्‍थ्‍य हे शोधण्‍यापेक्षा आपण त्‍याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्‍यापेक्षा आपण कितीतरी गोष्‍टी गमावित आहोत. खरंय ना 

सदाचरण व नैतिकता

फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्‍या विद्वत्तेचा व योग्‍यतेचा यथायोग्‍य आदर होता म्‍हणूनच तो त्‍यांची प्रत्‍येक गोष्‍ट ऐकत असे. प्रजेमध्‍येसुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्‍मानपूर्वक आदर होता. एक दिवस राजपुरोहितांना वाटले की राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्‍याला इतक्‍या आदरपूर्वक का वागवतात याचे कारण जाणून घ्‍यावे. राजपुरोहितांनी हे जाणून घेण्‍यासाठी एक गुप्‍त योजना बनविली. दुस-या दिवशी त्‍यानी दरबारातून परतताना राजाच्‍या खजिन्‍यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्‍याने न पाहिल्‍यासारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्‍हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्‍वत:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्‍यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्‍या व खिशात भरल्‍या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्‍यास सांगितले. राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्‍ट राजाच्‍या कानावर गेली. न्‍यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून घडलेल्‍या या चुकीबद्दल त्‍यांना तीन महिने सक्त कारावासाची सजा देण्‍यात यावी. तीनवेळेला त्‍यांनी कोषातून धन चोरले म्‍हणून तीन महिने सजा देण्‍यात आली आहे जेणेकरून ते पुन्‍हा असा अपराध करण्‍यात यशस्‍वी होणार नाही. या न्‍यायावर राजाने राजपुरोहितांची प्रतिक्रिया विचारली. राजपुरोहितांनी राजाला यामागील कारण सांगताना,'' राजन, मी काही अट्टल चोर नाही. मी फक्त जाणून घेण्‍यास इच्‍छुक होतो की लोक कशामुळे मला सन्‍मान देतात, वैयक्तिक माझा सन्‍मान करतात की मी करत असलेल्‍या सदाचरणाचा लोक सन्‍मान करतात. पण आता माझ्या लक्षात आले आले आहे की लोक हे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझ्या सदाचरणाला महत्‍व देतात. गैरवर्तणूक करताच मी दंडास प्राप्‍त झालो आणि त्‍यावेळेला माझी विद्वत्ता, संपत्ती, मानमरातब हे काहीही मदतीला आले नाही. माझे सद आचरण हेच माझ्या सन्‍मानाचे कारण आहे हे मला समजून चुकले आहे. मी माझ्या गैरवर्तणुकीबद्दल आपली क्षमा मागतो.'' राजाने यावर सांगितले,''राजपुरोहित महाराज, तुम्‍ही कोणत्‍याही भावनेतून जरी हे कार्य केले असले तरी तुम्‍हाला दंड होणे क्रमप्राप्त आहे तरी तुम्‍ही शिक्षेस तयार राहा.'' राजपुरोहितांनी राजाचे म्‍हणणे ऐकले व स्‍वत:ला सैनिकांच्‍या स्‍वाधीन केले.



तात्‍पर्य :-सदाचरण हेच मनुष्‍याचे धन आहे. नैतिकता पाळणे आणि ती आचरणात आणणे यातच मनुष्‍यजन्‍माचे सार्थक आहे. 

खरी आई कि खोटी आई

एका आठ वर्षाच्‍या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्‍या संगोपनात काही अडचण येऊ नये म्‍हणून वडील दुसरे लग्‍न करून त्‍या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्‍यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते?तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्‍यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्‍हणून पुन्‍हा त्‍या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्‍म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्‍हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्‍हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्‍हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्‍यासाठी उन्‍हातान्‍हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्‍वत:च्‍या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्‍हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्‍हाला? गेल्‍या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्‍हणूनच मी तिला खरी आई असे म्‍हणत आहे.''


तात्‍पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.

शेती आणि देव

एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो की तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी कशा घालतो ते पहाच तुम्‍ही.'' देव हसला आणि म्‍हणाला,''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते तो वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या ओंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा भरला गेला नव्‍हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते. त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही. आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.


लक्षात ठेवा 
जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाहीत.

50 वर्षाची तपस्या

एक फकीर 50 वर्षे एकाच जागेवर बसून रोज 5 वेळेला नमाज अदा करत असे. एक दिवस आकाशवाणी झाली आणि अल्लाचा आवाज फकीराच्‍या कानी पडला,'' हे फकीरबंदे, तू 50 वर्षापासून नमाज अदा करत आहेस पण तुझी एकही नमाज अजूनपर्यंत कबूल झालेली नाही.'' फकीराच्‍या शेजारी बसणा-या इतर सर्वांनी ही आकाशवाणी ऐकली व ते सर्वजणच दु:खी झाले. 50 वर्षाची तप:श्‍चर्या निष्‍फळ ठरली आणि फकीराची यावर प्रतिक्रिया असेल याचा विचार करत असतानाच एक आश्‍चर्यचकित घडणारी घटना तेथे घडू लागली. ज्‍या फकीराबाबत ही आकाशवाणी घडली होती तो फकीर आनंदाने नाचू लागला होता. तो अल्‍लाचे आभार मानत होता आणि अल्‍ला, अल्‍ला, या खुदा तेरा शुक्रिया करत आनंदाने नाचत होता. हे पाहून इतर सर्वांना वाटले या आकाशवाणीचा या फकीराच्‍या मनावर खूपच परिणाम झाला आहे. हे सर्व तो परिणामात करत आहे असे त्‍यांना वाटले. कोणीतरी त्‍या फकीराला विचारले,''बाबा, तुम्‍हाला खरे तर दु:ख व्‍हायला हवे होते. कारण तुमची 50 वर्षाची तप:श्‍चर्या आताच खुदाने नाकारली आहे. तरी पण तुम्‍ही इतके आनंदात कसे'' फकीर आनंदात उत्तरला,'' अरे गेली ती 50 वर्षाची तप:श्‍चर्या पण खुदाला हे तर माहित आहे की मी 50 वर्षे झाले त्‍याचे स्‍मरण करतो आहे. त्‍याला माझे या निमित्ताने का होईना स्‍मरण झाले हे काय कमी आहे. खुदाने माझी आठवण ठेवली हेच मला खूप आहे.''



तात्‍पर्य :- कोणतीही सेवा ही निष्‍फळ होत नाही, यथायोग्‍य वेळेस त्‍याचे फळ हे मिळतेच. सेवा करताना मनात तर मेवा मिळविण्‍याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही.

परिश्रमाचा राजहंस

एक जमीनदार होता. त्‍याला त्‍याच्‍या वाडवडीलांपासून खूप संपत्ती मिळालेली होती. अतिश्रीमंतीमुळे तो खूप आळशी बनला होता. त्‍याचा दिवस हा टवाळक्या करणे व हुक्का ओढत बाजेवर पडून राहणे यातच जात असे. त्‍याच्‍या या आळशीपणाचा फायदा त्‍याचे नोकरचाकर इमानेइतबारे घेत असत. त्‍याचे नातेवाईकही या आळशी स्‍वभावाला ओळखून होते व तेही त्‍याच्‍या संपत्तीचा गैरफायदा घेत असत, त्‍याची संपत्ती हळूहळू का होईना साफ करण्‍यात ते मश्‍गुल होते. एकदा परगावाहून जमिनदाराचा एक मित्र त्‍याला भेटण्‍यासाठी आला होता. त्‍याने हे सर्व नोकरचाकरांचे, नातेवाईकांचे वर्तन पाहिले व मित्राला कसे लुटले जात आहे हे त्‍याच्‍या लक्षात आले. त्‍याने हे जमिनदाराच्‍या कानावर घातले पण तो इतका आळशी होता की त्‍याने मित्राच्‍या बोलण्‍याकडे लक्षच दिले नाही. शेवटी त्‍याने एक हुकुमी एक्का वापरला. तो जमिनदाराला म्‍हणाला,’’ मित्रा, मला असे एक संतमहात्‍मा माहित आहेत की जे तुझी संपत्ती दुप्‍पट करून देऊ शकतील. फक्त तू त्‍यांच्‍या दर्शनाला चल व ते जसे सांगतील तसे तू वाग. तुझी संपत्ती अजून वाढेल.’’ जमिनदाराला पैशाची हाव सुटली व तो संतांकडे जाण्‍यास तयार झाला. संतांकडे जाऊन दर्शन घेतले व संतांना मार्गदर्शन करण्‍यास सांगितल्‍यावर ते म्‍हणाले,’’ तुझ्या शेतामध्‍ये एक राजहंस रोज पहाटे सूर्योदयापूर्वी येत असतो त्‍याचे दर्शन तू घेतल्‍यास तुझ्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. मात्र इतर कोणीही त्‍या राजहंसाला पाहण्‍यापूर्वी तू पाहणे गरजेचे आहे.’’ दुस-याच दिवशी जमिनदार लोभाने का होईना पहाटे उठला व शेतात गेला. त्‍याला तेथे एक आश्‍चर्यकारक दृश्‍य दिसले. त्‍याचा एक नातेवाईक पाठीवर धान्‍याचे भरलेले एक पोते शेतातून चोरून घेऊन चाललेला दिसला. नातेवाईकाला जमिनदाराने विचारले असता तो नातेवाईक ओशाळा झाला व माफी मागू लागला. जमिनदार लवकर उठला असल्‍याने तो दूध पिण्‍यासाठी गोठ्यामध्‍ये गेला तर तेथे अजून एक चकित करणारे दृश्‍य त्‍याला दिसले. त्‍याचे नोकर हे दूधामध्‍ये पाणी मिसळून दूध वाढवित होते व वाढविलेले दूध हे बाजूला ठेवून त्‍याचे पैसे मिळविण्‍यासंबंधी चर्चा करत होते. जमिनदाराने हे ऐकले व नोकरांना कामावरून काढण्‍याची धमकी देताच ते गयावया करू लागले व काम प्रामाणिकपणे करू असे त्‍यांनी सांगितले. जमिनदार आता रोजच लवकर उठू लागला व राजहंसाचे दर्शन घेण्‍यासाठी शेतात जाऊ लागला. यामुळे सगळे नोकरचाकर, नातेवाईक, धान्यचोर यांना मालक शेतात हजर असतो याची जरब बसली व ते चोरी करेनासे झाले. लवकर उठून शेतात फेरफटका मारल्‍याने जमिनादाराची तब्‍येत पण सुधारू लागली. चोरी कमी झाल्‍याने दूधदुभते, धान्‍य, पीक, भाजीपाला यातून जमिनदाराचे धन अजूनच वाढू लागले. पण राजहंस कसा दिसत नाही हा प्रश्‍न घेऊन तो संतांकडे गेला असता महात्‍मा म्‍हणाले,’’ अरे तुला तर तो राजहंस दिसला पण तू त्‍याला ओळखू शकला नाही. परिश्रम नावाचा एक राजहंस तुझ्या आयुष्‍यात आला आणि त्‍याने तुझ्यातल्‍या आळशीपणाला दूर करून तुझ्या धनाची वाढ करून दिली.’’



तात्‍पर्य :- परिश्रमरूपी परिस ज्‍यांच्‍या ज्‍यांच्‍या आयुष्‍याला स्‍पर्श करतो त्‍यांच्‍या जीवनाचे सोने बनते हाच या कथेचा आशय, 

दानातून मिळाला धडा

कानपूरमध्‍य़े गंगेच्‍या काठी बसून एक भिकारी भीक मागत होता. भिकेत त्‍याला जे मिळेल ते त्‍यातून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता. त्‍याच्‍या हातात एक कटोरा असायचा. त्‍याला तो जाणा-या येणा-याच्‍या पुढे करायचा. ज्‍याला त्‍यात काही टाकावयाचे असेल ते टाकत होता. परंतु तो भिकारी तोंडाने काही मागायचा नाही. अन्‍य भिका-याप्रमाणे तो दीनवाणा होत नसे. एके दिवशी तिकडून एक श्रीमंत माणूस जात होता. भिका-याने पाहिले, श्रीमंताच्‍या अंगावर अत्‍यंत भारी कपडे होते, गळ्यात आणि अंगावर सोन्‍याचे दागिने चमकत होते. उंची राहणी ही त्‍याच्‍या वर्तनातून दिसून येत होती. श्रीमंत वाटतो म्‍हणून भिका-याने त्‍याच्‍याकडे कटोरा पुढे केला, ते पाहून त्‍या श्रीमंताच्‍या चेह-यावर तिरस्‍कार उमटला. त्‍याने खिशातून एक रूपायाचे नाणे काढले व त्‍या भिका-याकडे फेकले व छद्मी हसला. तो पुढे निघणार इतक्‍यात भिकारी जागेवरून उठला. त्‍याने त्‍या श्रीमंताचे उद्धट वर्तन व गरीबांसाठी असलेले तिरस्‍करणीय भाव पाहून ते रूपायाचे नाणे श्रीमंताकडे परत फेकले व म्‍हणाला,’’ घे सांभाळ तुझी दौलत, मला तुझ्यासारख्‍या गरीबाचा पैसा नको, ज्‍या दानामध्‍ये तिरस्‍काराचा भाव आहे असे दान स्‍वीकार करू नये असे मला सांगण्‍यात आले आहे. दान करतानासुद्धा शुद्ध मनाने, चांगल्‍या भावाने दान करावे जेणे करून घेणा-याला व देणा-याला समाधान लाभते.परमेश्‍वराने माणूस बनविताना जर काही फरक केला नाही तर तू तिरस्‍कार करून परमेश्‍वराचा अपमान करतो आहेस हे लक्षात ठेव. ’’ हे ऐकताच श्रीमंताला आपली चूक लक्षात आली. त्‍याने तात्‍काळ भिका-याची क्षमा मागितली.


तात्‍पर्य :- दान सत्‍पात्री, प्रेमपूर्वक व नि:स्‍वार्थ भावनेने केल्‍यास त्‍याचे समाधान मिळते./ जगात सर्वजण समान आहेत. श्रीमंती आज आहे तर उद्या श्रीमंती नसेल याची जाणीव ठेवून वागले पाहिजे.

खरे सत्य

एका साधूला पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला.राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.’’


तात्‍पर्य :- ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नव्‍हे

राक्षसी प्रवृत्ती

एक राक्षस होता. त्‍याला आपल्‍या सर्व कामासाठी एका माणसाची गरज होती. त्‍याने शोधाशोध करून एका माणसाची नियुक्ती केली. तो माणूस खूप सज्जन होता. राक्षस सांगेल ते कोणतेही काम तो पूर्ण करत असे. तो अविरत काम करत असे. मात्र राक्षस आपली वाईट प्रवृत्ती दाखवून द्यायचाच. तो त्‍याला सतत धमकावत असे. कामात त्‍याला विलंब झालेला चालत नसे. माणसाने जरा जरी कामात विलंब केला तरी मी तुला मारून टाकीन असे धमकी वजा राक्षस बोलत असे. माणूस राक्षसाच्‍या भीतीने घाबरून आणखी वेगाने काम करत असे. माणूस विचार करायचा की आपण जर काम नीट केले नाही तर आपल्‍याला हा राक्षस मारून तर टाकायचा नाही ना. एकेदिवशी सकाळपासून संध्‍याकाळपर्यंत तो सतत काम करत होता. तो इतका थकला होता की त्‍याला सुस्‍ती येऊ लागली. त्‍याला एक पाऊलही टाकवेना. थोड्या वेळाने राक्षस आला. माणसाला बसलेला पाहून राक्षस ओरडला,’’ तुझी अशी रिकामे बसून राहण्‍याची हिंमत झालीच कशी, चल उठ कामाला लाग नाही तर मी तुला खाऊन टाकीन.’’राक्षसाच्‍या धमकीने माणूस घाबरला. त्‍याच्‍या मनात विचार आला की तू माणूस आहे व तो राक्षस आहे. धमकाविणे हे त्‍याचे काम आहे. तू जोपर्यंत याला घाबरशील तोपर्यंत हा तुला घाबरवत राहणार. एकदा का होईना याला प्रत्‍युत्तर दिलेच पाहिजे. शेवटी माणसाने मनाची तयारी केली. आता जे होईल ते होईल पण याला उत्तर हे द्यायलाच हवे हा पुरुषार्थ त्‍याच्‍या मनात जागृत झाला व तो राक्षसाला म्‍हणाला,’’ सारखे सारखे खाऊन टाकण्‍याची भाषा कशाला करतोस, खायचे असेल तर मला खाऊन टाक म्‍हणजे मी पण एकदाचा सुटलो.’’ त्‍याची ही हिंमत पाहून राक्षसाने आपले वागणे बदलले.



तात्‍पर्य :- रोजच्‍या जीवनातही असे राक्षस आपल्‍याला घाबरवत असतातच पण त्‍यांना किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायचे असते. ज्‍यादिवशी आपल्‍यातील भीती सोडून आपण पुढे चालू तेव्‍हा ही राक्षसीप्रवृत्ती आपोआप गप्प बसते. 

हरणाची चतुराई

एका जंगलात मोठ्या संख्‍येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्‍या सहका-यांची संख्‍या कमी होत चालल्‍याचे एका हरणाच्‍या लक्षात आले. त्‍याने आपल्‍या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही. त्‍या हरणाने आपल्‍या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्‍या वृक्षांच्‍या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्‍याचा मित्र त्‍याची गोष्‍ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्‍या पानाआड दडलेल्‍या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्‍यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्‍याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्‍या बळी पडून फळे खाण्‍यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्‍याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्‍याचे म्‍हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही.



तात्‍पर्य :- आजच्‍या काळात कोणी जर आपल्‍याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्‍याचे ऐकायला हवे.

स्वप्न

एकदा स्‍वप्‍न आणि सत्‍य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता भविष्‍य घडविण्‍यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्‍या पित्‍याकडे गेले. पित्‍याला वादाचा विषय सांगितला. पिता म्‍हणाला,’’ज्‍या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्‍याचा भविष्‍य घडविण्‍यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्‍वप्नाने एकाच उडीत त्‍याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्‍हाच उचलले गेले होते. मग सत्‍याने प्रयत्‍न केला मात्र त्‍याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्‍न केले पण दोघेही अयशस्‍वी राहिले. शेवटी थकून ते पुन्‍हा एकदा पित्‍याकडे गेले तेव्‍हा पिता म्‍हणाला,’’ भविष्‍य घडविण्‍यात सत्‍य आणि स्‍वप्‍न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’


तात्‍पर्य :- ख-या अर्थाने भविष्‍य घडवायचे असेल तर स्‍वप्‍नाला सत्‍याच्‍या खांद्यावर उभे राहायला हवे. 

केस

दोघां भावात जमिनीवरून तंटा निर्माण झाला. मामला कोर्टात पोहोचला. त्‍यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्‍या दोघांना प्रत्‍येकी दहा लाख रूपये वाटणीमध्‍ये आले होते. न्‍यायाधिशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्‍हणाला, माझा भाऊ प्रत्‍येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्‍याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्‍याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्‍हणाला, माझ्या वाडवडिलांची देणगी दिली म्‍हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्‍यावरही मी परिश्रम करण्‍याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्‍येक कामात माझा सहभाग असल्‍याने नोकरांची बोलण्‍याची हिंमत होत नव्‍हती. आता जेव्‍हा याच्‍याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्‍हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्‍वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे.’’यावर न्‍यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्‍याचा निर्वाळा दिला.



तात्‍पर्य : मिळालेले धन हे टिकवून ठेवणे हे फार अवघड काम आहे. 

मुर्ख राजा

एका राज्‍यात मूर्ख राजाचे शासन होते. त्‍याचे मंत्री, सेनापती, सरदार हे सर्वच्‍या सर्व मूर्ख व चापलुसी करणारे होते. त्‍या राजाच्‍या राज्‍यात व दरबारात विद्वानांचा अनादर केला जाई. एखादी व्‍यक्ती आपल्‍यापेक्षा हुशार आहे असे लक्षात आले त्‍याला राजाचे सहकारी अपमानित करत. या कारणाने कोणीही विद्वान, पंडीत, ज्ञानी मनुष्‍य त्‍या राज्‍यात जात नसत. त्‍यामुळे त्‍या राज्‍यात बौद्धिक चर्चांची परंपरा खंडीत झाली होती. एकदा राजाला माहिती समजली की, एक ऋषी तीर्थाटनासाठी निघाले आहे व ते आपल्‍या राज्‍यातून जाणार आहेत. मंत्र्यांनी सल्‍ला दिला की त्‍या ऋषींना आपल्‍या दरबारात बोलवावे जेणेकरून ते जर विद्वान, पंडीत असतील तर त्‍यांचा अपमान करून आनंद मिळविता येईल आणि जर ते ऋषी मूर्ख असतील तर त्‍यांचा सत्‍कार करावा म्‍हणजे जनतेचा विश्‍वास बसेल की राजा मूर्ख माणसांचाही सत्‍कार करणे जाणतो. राजा व मंत्री नगराच्‍या मुख्‍य दरवाजात जाऊन उभे राहिले. ऋषी नगरापाशी आले. नगराबाहेर काही जीर्ण झालेल्‍या झोपड्या पाहून थांबले व त्‍यांनी विचारले,’’ या कुणाच्‍या झोपड्या आहेत’’ राजाने उत्तर दिले,’’या बुद्धिमान, विद्वान लोकांच्‍या झोपड्या आहेत. बुद्धिमान लोकांना मी हाकलून दिले कारण मला बुद्धिमान लोकांशिवायही शासन चालविता येते हे दाखवून द्यायचे होते. माझ्या राज्‍यातून हाकलून दिलेले विद्वानलोक येथे काही काळ घालवित होते.’’ हे उत्तर ऐकताच ऋषी तात्‍काळ राजाला म्‍हणाले,’’ हे राजा, तर मग तुझ्या राज्‍यात एक पाऊलही न टाकता मी येथूनच मी परत जात आहे कारण जेथे विद्वानांचा आदर केला जात नाही, बुद्धिवंतांची कदर केली जात नाही, पंडीतांचे म्‍हणणे ऐकले जात नाही, बुद्धिवंतांची चर्चासत्रे घडत नाहीत अशाठिकाणी न जाणेच योग्‍य असते. जेथे हे सर्व घडत नाही त्‍याचा सर्वनाश जवळ आला आहे हे निश्र्चित समजावे.’’ हे सांगून ऋषी तेथून निघून गेले. कालांतरांनी मूर्खानी केलेल्‍या उपदेशाने राजाचे राज्‍य लयाला गेले. त्‍याचे पूर्ण पतन झाले. ऋषींची वर्तवलेला अंदाज खरा ठरला.


तात्‍पर्य :- बुद्धी कठीण समस्यांचे निराकरण करते. बुद्धिमानांचा आदर जर समाज करत असेल तर तो समाज पुढे जाऊन विकास करतो. विद्वान लोक जेथे वस्‍ती करतात तेथे ते विकास करतात. जेथे विद्वानांचे म्‍हणणे ऐकले जात नाही तेथे सर्वनाश अटळ आहे. खरे आहे ना, 

देशभक्ती

ही गोष्‍ट आहे स्‍वातंत्र्यपूर्व काळातील. देशाला लढूनच, प्रसंगी रक्त सांडूनच, हक्कासाठी भांडूनच स्‍वातंत्र्य मिळेल अशा विचारसरणीचे काही क्रांतीकारक होते. तर अहिंसेच्‍या मार्गानेच देश स्‍वतंत्र करता येईल असा काहींना विश्र्वास होता. एक लहान मुलगाही हे सगळे पाहून देशभक्तीची प्रेरणा घेत होता. आपल्‍या मुलामध्‍ये देशभक्ती ठासून भरलेली असल्‍याचे त्‍याच्‍या आईलाही जाणवले तेव्‍हा तिला खूप आनंद झाला. देश गुलामीच्‍या जोखडातून मुक्त झाला तर बरे होईल अशी भावना होती. पण मुलगा जर पोलीसांच्‍या तावडीत कधी सापडला तर जे देशासाठी भूमिगत राहून लढा देत आहेत त्‍यांची नावे व ठिकाणे तो उघड करेल अशी भीती तिला वाटत राहायची. यासाठी तिने त्‍या मुलाची परीक्षा घ्‍यायचे ठरवले. आईने मुलाला जवळ बोलावले व आपल्‍या मनातील ही भावना त्‍याला सांगितली. आईने मुलाला परीक्षा घेणार असल्‍याचेही सांगितले. मुलाने परीक्षेसाठी होकार दिला. आईने दिवा पेटवला व त्‍याच्‍या ज्‍योतीवर त्‍या मुलाला बोट धरायला सांगितले. त्‍या मुलाने जराही न घाबरता त्‍या ज्योतीवर हात धरला. हाताला पोळत असताना आईने त्‍याला क्रांतीकारकांची नावे सांगण्‍यास सांगितले पण मुलाने हुं की चूं सुद्धा केले नाही. मुलाचे हे धाडस पाहून आईने मुलाला कवटाळले. हाच मुलगा मोठेपणी एक महान क्रांतीकारक झाला. त्‍या मुलाचे नाव होते- अशफाक उल्लाह खान


तात्‍पर्य :- असंख्‍य देशभक्तांनी केलेल्‍या त्‍यागामुळे, बलिदानामुळेच देशाला स्‍वातंत्र्य मिळाले याची जाणीव प्रत्‍येकाने ठेवणे गरजेचे आहे.